मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करुन एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली. राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले होते, मात्र त्यांच्या मराठीच्या प्रेमावर कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यानंतर भाषणाला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असं म्हणून सुरुवात केली. राजकारण्यांनी आतापर्यंत मराठी माणसांना वापरलं आणि फेकून दिलं. संकटात मराठी माणून एकत्र येतो आणि संकट गेल्यावर एकमेकांशी भांडतो, या पुढे अशा डावांना बळी पडू नका असं म्हणत सर्व पक्षातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही मात्र सक्तीच्या विरोधात आहेत. त्यामुळं कोणावर दादागिरी करणार नाही पण दादागिरी केली तर ती सहन करणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
Site Admin | July 5, 2025 8:15 PM | Raj Thackeray | UddhavThackeray | Vijai Melava | Warli
मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन
