अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता ५ हजार ५०३ कोटी रुपये निधीला या बैठकीत मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. यात अष्टविनायक गणपतींच्या जिर्णोद्धारासाठी १४७ कोटी, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटी, जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २५९ कोटी, त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी, महालक्ष्मी मंदिर १४४५ कोटी आणि माहूर गडासाठी ८२९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. अहिल्यादेवींनी जे कार्य केलं होतं तेच राज्य सरकार करत आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यशवंत विद्यार्थी योजने अंतर्गत धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमधे प्रवेश दिला जाणार, विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार, मुलींसाठी आयटीआय स्थापन करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारायला तसंच जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करायला मान्यता दिल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीही देण्यात आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचं सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबवणार, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर शासनामार्फत चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी केली.
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो प्रकाशित करण्यात आला आहे. तसंच एक डाक तिकीटही जारी केलं आहे.
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जाहीर केला.