पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी सुरु झालेली ही मोहीम दीड वाजता संपली. गेली ३० वर्षं पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली. मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.