पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की, मुरीद, चक्लाला, रहिमयार खान या ठिकाणची लष्करी केंद्रं, नियंत्रण केंद्रं, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्धवस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली कुरेशी यांनी सांगितलं.
पाकिस्ताननं आज पहाटे दीडच्या सुमारास पुन्हा एकदा भूज, पठाणकोट, बठिंडा, उधमपूर, श्रीनगर आणि अवंतीपूर भागातली आरोग्य केंद्रं, शाळा, हवाई आणि लष्करी तळ तसंच नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला. भारतीय लष्कारनं हे हल्ले यशस्वीरित्या परतवल्याची माहिती कर्नल कुरेशी यांनी दिली. तसंच भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्धवस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगत त्यांनी तिथली आजची छायाचित्रं दाखवली. पाकिस्तान सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं यावेळी कुरेशी यांनी सांगितलं.
पाकिस्तानकडून होत असलेल्या या कारवाईला भारतीय हवाई दलानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित तळ लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच एस-४०० ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही सिंग यांनी सांगितलं.
दरम्यान, सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्यासह दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यावेळी दिली. पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचंही मिसरी यांनी नमूद केलं.