पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे. समाजमाध्यमावर बनावट प्रतिमा, चित्रफिती प्रसृत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे.
पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे, त्याच पद्धतीनं डिजिटल व्यासपीठावर बनावट बातम्या पसरवत आहे. भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळं नैराश्यानं ग्रासलेला पाकिस्तान खोट्या बातम्यांचा प्रसार करत जनतेची, माध्यमांची दिशाभूल करत आहे. भारतीय सैनिकांना पकडल्याचे किंवा भारतीय संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा प्रसार पाकिस्तानी समाज माध्यमं आणि वाहिन्यांवर केला जात आहे. तसंच भारतीय प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसानही लपवण्याचा प्रयत्न होत आहे.
भारतीय महिला वायूदल अधिकाऱ्याला पकडल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी समाजमाध्यमांवर पसरवला जात आहे. हिमालयीन क्षेत्रात तीन भारतीय फायटर विमानं पाडल्याचा बनाव २०१६ चं एक छायाचित्र दाखवून केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका फायटर जेटमधून भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याचंही खोटं वृत्त पसरवलं जात आहे. तसंच भारताच्या ननकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यामुळे भारताचा ७० टक्के वीज पुरवठा बंद पडल्याचा बनावही केला जात आहे.
अशा प्रकारचा कोणताही मजकूर आढळल्यास तात्काळ पत्र सूचना कार्यालयाला याची माहिती द्यावी, ८७९९७११२५९ या व्हॉट्सअप क्रमाकांवर किंवा socialmedia@pib.gov.in या मेलवर असा मजकूर पाठवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.