१९६३ मधे एका छोट्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापर्यंतचा टप्पा भारतानं गाठला असून भारताचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचं द्योतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आजपासून GLEX’ अर्थात १२ वी ‘जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद सुरू झाली. या परिषदेला प्रधानमंत्र्यांनी आज संबोधित केलं. भारताची क्षेपणास्त्रं देशातल्या दीडशे कोटी नागरिकांच्या आकांक्षा वाहून नेतात, हा प्रवास उल्लेखनीय आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. अंतराळ संशोधनातली भारताची प्रगती समाधानकारक आहे, असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताच्या मंगळ आणि चांद्रयान मोहिमेबद्दल गौरवोद्गार काढले. यावर्षी भारतानं दोन उपग्रहांचं प्रक्षेपण केल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
या परिषदेचं उद्घाटन अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज झालं. आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तसंच भारतीय अंतराळवीर सोसायटी यांनी संयुक्तपणे GLEX 2025 आयोजित केली आहे. जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताच्या विस्तारणाऱ्या नेतृत्वामधला एक मैलाचा दगड ठरला आहे. २०१० पासून, ग्लेक्स परिषद संवाद, सहकार्य आणि नवोन्मेष यासाठीचं एक प्रमुख व्यासपीठ बनलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ३६ देशांमधल्या २३३ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह १८०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.