ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.
डीएमके खासदार के कन्निमोळी यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने काल ग्रीसचे परराष्ट्र उपमंत्री, परराष्ट्र मंत्रालयातले उच्चाधिकारी आणि महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. दहशतवादी आणि त्यांना सहाय्य किंवा आश्रय देणारे यांच्यामध्ये फरक करता कामा नये ही भारताची भूमिका त्यांनी मांडली.
भाजपा खासदार रवीशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रोममध्ये परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षांची तसंच भारत इटली मैत्री समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली. भारत आणि इटली दोघांच्याही दहशतवादाविरोधात मतात साम्य आहे, असं रवीशंकर प्रसाद यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.
संजयकुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने इंडोनेशियातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या नेतृत्वाशी संवाद साधला आणि दहशतवाद विरोधातील भारताच्या शून्य सहनशक्ती धोरणाबाबात चर्चा केली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पनामात भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या बैठकीत दहशतवाद विरोधात भारत कठोर धोरणांचा अवलंब करत असल्याचं अधोरेखीत केलं. यापुढेही जशास तसे उत्तर भारताकडून दिले जाईल असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्नाखालील शिष्टमंडळ 27 तारखेपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने दक्षिण आफ्रिकेच्या उपमंत्र्यांना भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली तसंच केपटाऊनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांची भेट घेतली. पहेलगाम हल्ल्याच्या वेळी सौदी अरेबियाच्या राजकीय नेतृत्वाने दिलेल्या पाठिंब्याबद्द्ल त्यांनी आभार मानले.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील भेटीनंतर सिएरा लिऑन या देशात पोहचलं आहे.