संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून समाज एकसंघ ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. संताची भूमिका लोककल्याणाची होती, संत साहित्य टिकून राहिलं तर समाज एकसंध राहील, असं ते म्हणाले. वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी इथं आज सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र संतांची भूमी असून वारकऱ्यांनी समाजप्रबोधन काम प्रभावीपणे करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना केलं. संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष देहूकर यांनी काढले. दोन दिवस चालणाऱ्या या संत साहित्य संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे. या संमेलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं वारकरी आणि संत अभ्यासक उपस्थित झाले असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.