नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नागरी विमान उड्डाणं सुरु झाल्याचं वृत्त आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासंदर्भातील सुरक्षेच्या सर्व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणानं दिली आहे. विमानसेवेचं कामकाज सामान्य असलं तरी, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे उड्डाणवेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षेसंदर्भातील प्रक्रियेला जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रवाशांनी संबंधित विमानकंपनीच्या सूचनांचं पालन करावं, प्रवासातील सामानाचे नियम पाळावेत, सुरक्षा तपासणीत संभाव्य विलंबासाठी विमानतळावर लवकर पोहोचावं आणि संरक्षणविषयक सुरळीत प्रक्रियेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असा सल्ला विमानतळ प्राधिकरणानं दिला आहे.