दीड दिवसांच्या मंगलमूर्तींचं आज विसर्जन होत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. यंदा ५०० हून अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत ५७५ घरगुती तर ३ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. नवी मुंबईत नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 143 इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारपासून दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. आज सुमारे १२ हजार गणपतींना निरोप दिला जात आहे. सततच्या पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडत आहे.
सांगली इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थान चा 246 वा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविक गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ ओढला. गोंदियातल्या गोशाळा संचालकांनी गाईच्या शेणापासून श्री गणेशाची बीज युक्त मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना केली आहे. गौ रक्षणाचं तसंच गाईच्या शेणाचं महत्व इतरांना पटवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ऋषीपंचमीनिमित्त आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर ३५ हजार महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. तसंच नाशिकला त्र्यंबकेश्वर इथे आणि नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीकिनारी ऋषीपंचमीनिमित्त स्नानासाठी गर्दी उसळली होती.
शेगावमध्ये गजानन महाराजांचा ११५वा पुण्यतिथी ऋषिपंचमी महोत्सव उत्साहात साजरा होतो आहे. यानिमीत्तानं समाधीस्थळ आणि सर्व मंदीरं दर्शनासाठी संपूर्ण रात्रभर खुली असणार आहेत.
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.